लोक वार्ता – राज राठोड
पुणे : मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ (Cercuit Bench) पुणे येथे स्थापन व्हावे, या वकिलांच्या मागणीला आता सामाजिक संघटनांचा देखील पाठिंबा मिळत आहे. या मागणीला ‘बहुउद्देशीय क्रांतिसूर्य संस्था’ने जाहीर पाठिंबा दिला असून, या अनुषंगाने पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. हेमंत झंझाड यांना संस्थेच्या वतीने अधिकृत निवेदन सादर करण्यात आले.
या प्रसंगी ‘बहुउद्देशीय क्रांतिसूर्य संस्था’चे अध्यक्ष– लखन सनादे, सचिव– स्वप्नील जोगदंड आणि खजिनदार– कुंदन सोनवणे हे उपस्थित होते. याचबरोबर पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. श्रीकांतसर अगस्ते, ॲड. अक्षय दिवाणे आणि ॲड. मंगेश जोगदंड यांनीही या उपक्रमात सहभाग घेतला.
पुण्यासारख्या वेगाने विकसित होत असलेल्या आणि महाराष्ट्रातील प्रमुख शैक्षणिक, औद्योगिक व कायदेशीर केंद्र असलेल्या शहरात उच्च न्यायालयाचे खंडपीठ असणे काळाची गरज असल्याचे मत उपस्थितांनी मांडले. पुण्यातील नागरिकांना न्यायासाठी मुंबई गाठावी लागते, ही बाब वेळ, पैसा आणि मानसिक त्रास देणारी ठरत आहे. त्यामुळे पुण्यातील वकिलांच्या या मागणीस आता सामाजिक स्तरावरही बळ मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
यावेळी संस्थेच्या प्रतिनिधींनी सांगितले की, केवळ वकिलांचे नव्हे तर सर्वसामान्य जनतेचे हित लक्षात घेऊन खंडपीठ पुण्यात व्हावे ही मागणी आम्ही सातत्याने मांडत राहू.




















